मन
विषण्ण करणाऱ्या बातम्यांमध्ये काल एक भर पडली. बातमी प्रजावाणीत प्रकाशित झाली
म्हणून, बाकी परिस्थिती नवीन नाही. वृत्तपत्रांनी दखल घ्यावी हा कौतुकाचा विषय,
तरीपण बातमी मुळात वाईट. मथळा असा कि “बीओटीच्या वाळवीने लोहिया वाचनालयाला
पोखरले!” प्रजावाणीचे मूळ संपादक कै. सुधाकरराव डोईफोडे समाजवादी विचारसरणीचे
होते. ते आणि त्यांच्यासारखे इतर अनेक सुशिक्षित, सुविद्य विचारवंत नांदेडच्या
जडणघणीत होते हे एका पिढीचे सुदैव. आज तसे लोक नाहीत हे या पिढीचे दुर्दैव. असो.
विषय वाचनालयाचा.
आठवते
तसे नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मागच्या पायऱ्यांनी जाऊन
वाचनालय होते. पुढे नगरपालिकेच्या इमारतीमागे राजा राममोहन रॉय पुस्तकालय
प्रतिष्ठानच्या आर्थिक साह्याने एक स्वतंत्र इमारत वाचनालयासाठी उभारली गेली. नगरपालिकेची
इमारत आणि वाचनालयाची इमारत यामध्ये कुंपण होते.
मुलांसाठी
व स्त्रियांसाठी वेगळे दालन, वृत्तपत्रे असणारे एक खुले दालन
तळमजल्यावर आणि वर पुस्तकालय अशी ती इमारत होती. प्रवेशद्वाराशी मुरली लाहोटींचे
एक भित्तीचित्र होते. समोर प्रशस्त हिरवळ, कारंजे असा थाट होता. मुख्य म्हणजे
अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय समृध्द ग्रंथभांडार या
वाचनालयाने संकलित केले होते. वाचनालयाची एक शाखा गणेशनगर मध्ये होती. इतर अनेक
ठिकाणी वृत्तपत्र वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात येत असत. पंचवीसेक वर्षांखाली
कुठल्याशा दिवाळी अंकात इतरांबरोबर त्या वाचनालयाच्या इमारतीचे छायाचित्र प्रकाशित
झाले होते. थोडक्यात नगरपालिकेचे वाचनालय ही नांदेडकरांसाठी अभिमानाची, कौतुकाची
गोष्ट होती. मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी भाषेतील दर्जेदार नियतकालिके, या
भाषांतील ललित साहित्य, वैचारिक आणि ऐतिहासिक पुस्तके, संदर्भ ग्रंथ, विविध
विश्वकोश, नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तके, इंग्रजी भाषांतरात विश्व साहित्य आणि
ज्याला popular किंवा
लोकप्रिय याशिवाय काही म्हणता येणार नाही अशी चिक्कार पुस्तके नांदेडच्या किमान
दोन पिढ्यांना मनोरंजन आणि प्रबोधनासाठी पुरली.
काळ
बदलला, वेळ बदलली. काहीच कारण नसताना अवतीभवतीची गावे, नगरपालिका गिळंकृत करून
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका असे एक अजस्त्र आणि भयंकर प्रकरण नांदेडकरांवर
लादले गेले. परिणाम असा झाला कि या महानगरपालिकेसाठी वाचनालयाची इमारत हळूहळू
गिळंकृत करण्यात आली. आधी एक कक्ष, नंतर दुसरा, नंतर एक मजला आणि शेवटी सगळी इमारत
मनपाच्या वेगवेगळ्या विभागांनी व्यापून टाकली. हे सर्व सोपे झाले कारण वाचनालय ही
सर्वसाधारण चाकरमान्या, पांढरपेशा, मिळमिळीत मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याची
गोष्ट. त्यात ना जातीचे राजकारण, ना कुठल्या समाजाचे ध्रुवीकरण. कुणी विरोध करायचा
प्रश्नच नव्हता, आणि विरोध केला तरी ऐकणार कोण होते? हे सगळे झाले तेव्हा कुठल्या
वृत्तपत्रात काही आले असेल तर शप्पथ. पुन्हा असो. विषय डॉ. राम मनोहर लोहिया
वाचनालयाच्या इमारतीचा.
मनपाची
नवीन इमारत बांधताना ती सुंदर इमारत जागेसह गिळंकृत करण्यात आली. नवीन बांधलेली
वास्तू साधारण तीस वर्षे संपण्याआधीच पडली. अतिशय धोकादायक अशा तरोडेकर मंगल
कार्यालयाच्या जागेत अंधाऱ्या आणि गळक्या दालनात वाचनालय हलवले. नतद्रष्टपणा असा
कि अक्षरशत्रू सत्ताधाऱ्यांनी नव्या टोलेजंग इमारतीत किंवा मनपाच्या प्रांगणात
वाचनालयासाठी जागेची तरतूद केली नाही.
राजा
राम मोहन रॉय प्रतिष्ठानाकडे द्यायला भरपूर निधी आहे. गेल्या दोन दशकात
वाचनालयाविषयी जागृती झाली आहे. केंद्र व राज्य शासनही ग्रंथालयास भरपूर अनुदान
देत असते. वाचनालयांची गरज इंटरनेटमुळे कमी होत असताना प्रत्यक्ष पुस्तक हातात
घेऊन वाचण्याकडे काळ वाढवायसाठी वाचनालये आवश्यक आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी
अभ्यास व्हावा म्हणून वाचनालय आवश्यक आहेत. इतरही अनेक उपक्रम आहेत ज्याने
वाचनालये समृध्द होऊ शकते. पण त्यासाठी दृष्टी हवी.
तशी
दृष्टी नांदेडला डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय सुरु करणाऱ्या तत्कालीन
नगरपालिकेमध्ये होती. बहुतेक इतर ठिकाणी शासकीय ग्रंथालये किंवा सेवाभावी
संस्थांद्वारे चालविलेली वाचनालये आढळली. नांदेडच्या नगरपालिकेनी उभारलेले वाचनालय
त्यामानाने अप्रतिम होते. इतर कुठेही नगरपालिकेचे इतके समृध्द ग्रंथालय असल्याचे
ऐकिवात नाही. आता इतकी वर्षे मनपाची नवीन इमारत होऊनही वाचनालयाला हक्काचे घर मिळत
नाही ही शरमेची बाब आहे.
दु:ख
याचे कि याविषयी कदाचित कोणाला काही वाटणार नाही. एक समृध्द वाचनालय शहरासाठी काय
करु शकते याची कल्पना फक्त एवढ्यात कि वाचनालये विचारांना चालना देणारी
धर्मनिरपेक्ष ध्यानकेंद्रे आहेत. सर्वधर्मसमभाव, बंधुता, परस्परस्नेह यांचे उत्तम
उदाहरण म्हणजे वाचनालये. इथे माणूस एकटा असूनही सर्वांमध्ये असतो.
या
सर्व प्रकरणात हेही लक्षात ठेवले पाहिजे कि मनपाला स्वत:च्या मालकीची जास्तीत
जास्त जागा व्यावसयिक वापरासाठी पाहिजे आहे. त्यामुळेच मनपाची इमारत झाल्यानंतर अनेक
ठिकाणी बीओटी तत्वावर इमारती बांधल्या त्यातही वाचनालयाला जागा मिळाली नाही. याचे
एक मुख्य कारण असे कि राजकारण हा बुद्धीजीवी वर्गाचा प्रांत राहिला नाही. नियमाला
अपवाद असे दोन-चार नगरसेवक सोडले तर गेल्या दोन दशकातील नगरसेवकांपैकी कुणीही कधी
वाचनालयाचा सदस्य राहिला असेल का याबाबत शंकाच आहे. आणि आता टीव्ही आणि
इंटरनेटमुळे पुस्तक वाचणारेही कमी झाले आहेत. पण पुजारी व्यवस्थित पूजा करत नाहीत
किंवा तितकेसे भक्त येत नाहीत म्हणून देऊळ बंद करायचे नसते. त्यामुळे मनपाला
स्वत:च्या मालकीच्या जागा कवडीमोल भावात विकासकांच्या घशात घालायची जी घाई लागली
आहे त्यात इतके समृध्द वाचनालय बळी जाऊ नये ही अपेक्षा.

